सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची तसेच प्रत्येकी ₹२,५०० दंडाची शिक्षा सुनावली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५०/२०१६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी बाळू नामदेव सानप (रा. निमगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे होते. तर आरोपी सुभाष पुंडलिक सानप (वय ३२), पुंडलिक किसन सानप (वय ६५) आणि मंगल सोमनाथ सांगळे (वय २७, सर्व रा. निमगाव, ता. सिन्नर) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आरसीसी क्रमांक २१/२०१७ या प्रकरणाचा निकाल ९ जुलै २०२६ रोजी माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर येथील न्यायाधीश श्री. वाडेकर यांनी दिला. न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(२) नुसार तिन्ही आरोपींना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सक्त कारावासाची व प्रत्येकी ₹२,५०० दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. निकालानंतर आरोपींनी न्यायालयात एकूण ₹७,५०० दंडाची रक्कम जमा केली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक एच. ए. बागुल यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. जगदीश पाटील यांनी काम पाहिले, तर न्यायालयीन पैरवी हेड कॉन्स्टेबल दाते यांनी केली.






















