परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय १९ वर्ष हा घरच्या नातेवाईकासोबत गोदावरी नदीपात्रामध्ये अंघोळीसाठी गेला असता नदीपात्राममधील खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याच खड्यामध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला.अधिक माहिती अशी (दिनांक १८ जून गुरुवार) रोजी सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान बळीराम शिंदे यांचा मुलगा राधाजी शिंदे हा आपल्या नातेवाईकांसोबत गोदावरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेला असता पोहता पोहता वाळू माफियांनी केलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये अडकून त्याचा दुर्दैवी अंत झाला.उपस्थित नागरिकाच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यात आले व तात्काळ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी तपासून शिंदे यास मृत घोषित केले.
शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले दुपारी गोदाकाठी स्मशानभूमी मध्ये पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.कुटुंबात आई-वडील लहान भाऊ बहीण असा परिवार असून या घटनेमुळे शहरांमध्ये हळूहळू व्यक्त होत आहे.महिन्यापूर्वीच शहरातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला मृत्यूची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नदीपत्रामध्ये वाळू माफीयांनी केलेल्या खड्ड्यामुळे निष्पाप युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याने शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तात्काळ घटनेची दखल घेऊन भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.






















