विष्णू आचार्य (लातूर प्रतिनिधी ) : रेणापूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत सोमवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने गहू, हरभरा, ज्वारीसह इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा व द्राक्ष बागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके अक्षरशः अस्मानी संकटाने हिरावून घेतली आहेत.
गारपिटीचा जबर फटका

रेणापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. गारपिटीमुळे गव्हाच्या कणसांचे मोठे नुकसान झाले असून हरभऱ्याच्या शेंगा गळून पडल्या आहेत. ज्वारीची पिकेही वाऱ्याने आडवी झाली आहेत. बागायती क्षेत्रात आंब्याच्या मोहोराला व लहान फळांना मोठा फटका बसला, तर द्राक्ष बागांमध्ये घड तुटून पडल्याचे चित्र आहे.
विटभट्टी व ऊस वाहतुकीलाही फटका
अचानक आलेल्या पावसामुळे विटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तयार विटा पावसात भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने उसाच्या फडातच अडकून पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आधीच खरीपात फटका, आता रब्बीही संकटात
यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसारखे नगदी पीक पाण्यात वाहून गेले होते. त्या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने रब्बीची पेरणी केली होती. दिवस-रात्र कष्ट करून उभी केलेली पिके काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच अवकाळी पावसाने घात केला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे हतबल झाला आहे.
पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी
नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.























