Time of Maharashtra Desk: नाशिक महानगरपालिकेच्या २०२६ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आज होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गट चे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून, या प्रवेश सोहळ्यास राज्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.
मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या पक्षप्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. प्रस्थापितांविरोधात ठामपणे लढणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मी ठामपणे पाठीशी आहे. या संदर्भात निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही,” असे फरांदे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा विरोध
प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडूनही तीव्र विरोध केला जात आहे. भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत, आजवर हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. “पक्ष न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे,” अशी भावना नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपचा मोठा राजकीय डाव
मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील युती जाहीर झाल्यानंतर भाजपने नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत त्यांची सून अदिती पांडे भाजपकडून उमेदवार असणार आहेत. यतीन वाघ आणि शाहू खैरे हे देखील प्रभाग क्रमांक १३ मधून इच्छुक असून, संपूर्ण पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
आधीच प्रवेश, आता डोकेदुखी वाढली
चार दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तिकीटाच्या अपेक्षेने अनेक इच्छुक आधीपासूनच तयारीत असताना, आजचे नवे प्रवेश भाजपसाठी अंतर्गत समन्वयाचे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
विनायक पांडेंनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
पक्षप्रवेशापूर्वी प्रतिक्रिया देताना विनायक पांडे म्हणाले,“मागील निवडणुकीत माझ्या मुलाचे तिकीट कापले गेले. यंदाही तिकीट मिळाले नाही. त्यामुळे आता सूनबाईला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सतत डावलले जात होते. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी नाही, मात्र मधल्या नेत्यांमुळे संवाद होत नव्हता. आम्ही संपूर्ण पॅनल तयार केला असून, मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करू,” असा दावा त्यांनी केला.
पक्ष सोडला नाही पक्षातून हकालपट्टी – संजय राऊत
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट चे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर महत्त्वाचे ट्विट केले आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. ही कारवाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे ठाकरे गटात पुनरागमनाचे सर्व पर्याय बंद झाल्याचे मानले जात आहे.
भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर
एकीकडे भाजप मोठ्या प्रमाणात नेते खेचून आणत असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून येत असल्याने नाशिक भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. या वादावर पक्ष नेतृत्व कसा तोडगा काढते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






















