नगरसेवक वसीम शेख ठरले जायंट किलर
२६ नगरसेवकांत २,२८४ मते मिळवत घेतले लीड
Times of Maharashtra Desk, Pune: नुकत्याच पार पडलेल्या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तासमीकरणांचा आश्चर्यकारक खेळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी नगराध्यक्षपद मिळविले असले, तरी नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्रपक्षांनी तब्बल १७ जागांवर विजय मिळवत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे बहुमत जनता देत असतानाही सत्ता हातातून निसटली अशा चर्चा शहरात सुरू आहेत.
या सत्तासंघर्षामागे स्थानिक राजकारणातील प्रमुख नेते प्रेमसुख कटारिया यांची दीर्घकाळ टिकून असलेली पकड पुन्हा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. यंदा भाजपने निवडणुकीची सूत्रे आमदार राहुल कुल यांच्या हातात दिली होती, त्यांनी संघटनात्मक स्तरावर प्रयत्न केले. मात्र अंतर्गत मतभेद आणि क्रॉस व्होटिंगमुळे निकालात फरक पडल्याचे राजकीय वर्तुळात सूर उमटत आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मध्ये घडलेला प्रसंग विशेष चर्चेत आहे. नागरिक हित संरक्षण मंडळाकडून उमेदवारी मिळालेल्या अॅड. महेश गोपीनाथ नवगिरे यांना प्रचारादरम्यान मोठा राजकीय दबाव सहन करावा लागल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. विरोधकांनी काढलेल्या मोर्चामुळे लोकशाही मूल्यांचा भंग झाल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
नवीन चेहरा असलेल्या नवगिरे यांनी अनुभवी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढा देत १००४ मते मिळवत आपली ताकद दाखवली. तथापि, त्यांच्या विरोधात झालेल्या राजकीय हालचालींमुळे त्यांचा पराभव झाल्याची भावना समर्थकांमध्ये दिसून आली.
आता नवगिरे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी काही ठिकाणी होताना दिसत आहे. प्रेमसुखजी कटारिया आणि आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीतील निकालाचा आदर राखत जनतेच्या मतांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वसीम शेख यांनी विक्रमी मतांनी मिळवलेला विजय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल २,२८४ मतांची आघाडी घेत त्यांनी २६ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मते मिळवत ताकद दाखवून दिली आहे. निवडणूकपूर्व सर्व अंदाज फोल ठरवत शेख यांनी थेट बालेकिल्ल्यावरच विरोधकांचा पराभव केला असल्याने त्यांना जायंट किलर अशी उपाधी मिळत आहे.
त्यांच्या मागे उभा राहिलेला तरुण कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय आणि मतदारांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पुढील राजकारणात वसीम शेख यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण निवडणुकीतून दौंडच्या स्थानिक राजकारणातील ध्रुवीकरण आणि सत्तेसाठी होणारा संघर्ष स्पष्टपणे समोर आला आहे. निवडणूक संपली असली तरी पुढील काही दिवस दौंडच्या राजकारणात चुरस कायम राहण्याची शक्यता आहे.






















