ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवले जात आहे. याच अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी पिंपळगाव (आवळगाव परिसर) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकाच शिबिरातून ५२६ लाभार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल प्रशासनाने आपली गतिमानता सिद्ध केली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी हे अभियान मैलाचा ठरेल. नागरिकांना चकरा न मारता एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळाव्यात आणि कोणत्याही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, हाच शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.”
या शिबिराला नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, दुय्यम निबंधक जयंत मडावी आणि ग्रामसेवक प्रदीप तलमले यांची प्रशासकीय उपस्थिती होती. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जसे की, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, तालुका सरचिटणीस अविनाश म्हस्के, संदीप आष्टेकर, सरपंच प्रितम बाबनवाडे आणि उपसरपंच गुरुदेव वाघरे उपस्थित होते.
शिबिरात जवळपास ६०० ते ७०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. केवळ दाखल्यांचे वाटपच नव्हे, तर नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर चर्चा करून त्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले. महसूल विभागाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.






















