गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. संभाजी महाराज यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, जीवन यशस्वी करायचे असेल तर प्रयत्नांसोबत संतांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. परमार्थ तत्वनिष्ठ असावा, व्यक्तिनिष्ठ नसावा. ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती या मार्गांचा स्वीकार करून संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. संत हे जगाच्या कल्याणासाठी कार्य करतात.

महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपेने, वै. महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महंत दत्ता महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सप्ताहाच्या सांगतेला काल्याचे कीर्तन झाले.
या वेळी पंचक्रोशीतील वारकरी, टाळकरी, भजनी मंडळे तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.






















