गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत होणार आहे. नागपूरकरांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की, पहिल्यांदाच त्यांच्या जीवनावर आधारित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले‘ या महानाट्याचे भव्य सादरीकरण नागपुरात होणार आहे.
महानाट्याविषयी
‘रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशन’ची निर्मिती असलेल्या या महानाट्याचे लेखन इंजि. अशोक काळे यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा रंजना शिंगाडे यांनी सांभाळली आहे. एका अतिशय भव्य स्वरूपात हा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेरणादायी जीवनसंघर्ष:
३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे जन्मलेल्या सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खंबीर साथीने त्यांनी शिक्षणाचा वसा हाती घेतला. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि मुलींचे शाळेत जाणे चुकीचे मानले जात असे, त्या कठीण काळात त्यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
समाजाचा रोष पत्करून, अंगावर दगड, शेण आणि चिखल झेलूनही त्या आपल्या ध्येयापासून कधीच मागे हटल्या नाहीत. त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रसारच केला नाही, तर महिलांचे अधिकार, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या प्रश्नांवरही मोठा लढा उभारला. महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणाऱ्या सावित्रीबाईंनी १८९७ मध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राण गमावले. त्यांचा हाच अफाट त्याग आणि संघर्ष या महानाट्यातून उलगडणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: २ जुलै २०२६
वेळ: सायंकाळी ६:०० वाजता
स्थळ: कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर
अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा अनुभवण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समिती मधील रंजना शिंगाडे यांनी केले आहे






















