टाइम्स ऑफ महाराष्ट्र विशेष लेख : डॉ. संजय भागवत
आज नवी मुंबई महापे येथील ‘बिटाकेम’ या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत प्रचंड नुकसान झाले. ही आग खुप भीषण होती. ती आणखी इतरत्र पसरुन शेजारच्या इतर कंपन्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अग्निशामक दलाच्या ९ गाड्या व इतर खाजगी पाण्याचे टॅंकरही घटनास्थळी मदतीकरता धावून आले होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पण अशा घटना एम.आय.डी.सी. मध्ये वारंवार का घडतात? याचा विचार कंपन्यांचे मालक, कंपनीअधिकारी, कर्मचारी,सरकारी धोरणे आणि अंमलबजावणी अधिकारी यासर्वानी करायला पाहिजे असे आता प्रकर्षाने जाणवते आहे.
केमिकल साठवणूक: काळजी व सुरक्षा
केमिकल कंपन्याना लागणारे केमिकल किती लागते?त्याची साठवणूक आणि जपवणूक कशी करावी.? त्यासाठी तापमान किती असावे ? कुलीग सिस्टिम आहे का? केमिकल ठेवायची जागा तेवढी सोईची आणि सुरक्षित आहे का?ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे.त्यानुसार साठवणूक केली आहे का?त्यासाठी शासकीय परमिट/परवाने घेणे गरजेचे असतात ते घेतले आहेत का? हे सर्व तपासणे गरजेचे आहे.
शॉर्ट-सर्किट – ही एक गंभीर समस्या आहे.
आग लागली याला जबाबदार कोण? अपघातानंतर जेव्हा सर्च रिपोर्ट येतो त्यातल्या अनेक कारणांपैकी शॉटसर्किट हे एक कारण दिसून येते. याला वीज कंपन्या,कारखान्यातील जुनी, कालबाह्य झालेली इलेक्ट्रिक यंत्रणा, कर्मचाऱ्यावर येणार जादा कामाचा ताण, अप्रशिक्षित कर्मचारी, कर्मचाऱ्याची बेफिकिरी अथवा जाणते-अजाणते होणारी चूक या आणि यासारख्या अनेक गोष्टी लक्षात येतात पण त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून दीर्घकालीन आणि कायमस्वरुपी उपाययोजना केल्याचे प्रमाण फार कमी आहे असे दिसते.
मदत आणि अडथळे
एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर जेव्हा प्रथम संपर्क येतो तेव्हा अग्निशामकदलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेतात. हे तर उत्तमच आहे, पण या गाड्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांना रस्त्यावरच्या वाहतुकीचा प्रचंड अडथळा होतो. ॲम्बुलन्सप्रमाणेच अग्निशामक दलाच्या गाड्यानासुद्धा प्राधान्यक्रमाने पुढे जाण्याची मुभा असून देखील त्याना सहज पुढे जाता येईल अशी परिस्थिती आणि समाजाची मानसिकता नसते त्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याचे दिसून येते.बेशिस्त वाहतुकीमुळे गाड्यांना पुढे जाता येत नाही. तशातही गाड्या घटनास्थळी पोहतात तेव्हा औद्योगिक वसाहती असेल त्याचे थोडेफार नियोजन असतेच, पण अशी काही ठिकाण असतात की त्या ठिकाणी अरुंद रस्ते, नियोजन शून्य बांधकामे, अनाधिकृत बांधकामे,अतिक्रमणातून निर्माण झालेली बांधकामे या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे अग्निशामक दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत सहज पोहोचता येत नाही. वाहन तिथे पोहोचेपर्यंत बराच वेळ झालेला असतो. अशावेळी नुकसान तर झालेले असतेच पण ते पण ते कमी व्हावे,जीवीत हानी कमी व्हावी म्हणून अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रयत्न करतात.असाच प्रयत्न ॲब्युलन्स वाहक आणि मदतनीसांचा असतो.अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी ॲम्बुलन्सची ही सुविधा देणारी केंद्रे, सार्वजनिक मंडळे,सरकारी हॉस्पिटल्स हे प्रयत्नशील असतातच अशावेळी त्यांचेही सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.त्याविषयी नंतर सविस्तर लिहिनच.
‘आगीचाबंब'(अग्निशामकगाड्या)यांना पहिल्यांदा जाऊ द्या.
कारखान्यांमध्ये लागणाऱ्या आगींचे प्रमाणा कमी होण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना तत्काळ पुढे जाऊ देण्यासाठी शाळा,महाविद्यालय महाविद्यालये,सामाजिक संस्था याद्वारे समाजजागृती झाली पाहिजे तसेच अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि अडथळे कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर कोणत्याही तडजोडी शिवाय सक्तीचे प्रयत्न केले पाहिजेत.
समर्थ आणि सक्षम अग्निशामक दल
अग्निशामक दलाचे काम कौतुकास्पद आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपतग्रस्तांचा जीव वाचवित असतात. अशावेळी अग्निशामक दलाचा एखादा कर्मचारीही जखमी अथवा बळी पडल्याच्या घडतात त्या होऊ नयेत म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण शरीर सुरक्षित राहील अशी अधुनिक ॲप्रोन, जॅकेट,हॅन्डग्लोज,शूज तत्सम साधने व उपकरणे उपलब्ध करून दिली पाहिजेत. तसेच दरवर्षी घडणाऱ्या अग्निकांडाच्या घटना लक्षात घेता एम.आय.डी.सी एरिया, महानगरपालिका यांनी अग्निशामक दलामध्ये अत्याधुनिक वाहनांची संख्या वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी संबंधित यंत्रणेने खास आर्थिक तरतूद करणे गरजेची आहे.
ऑडीट आणि कारवाई अत्यंत गरजेची
याशिवाय केमिकल फॅक्टरी, उद्योग कारखाने यांचे केमिकल स्टोरेज, मशिनरी, वीज यंत्रणा आणि कर्मचारी आरोग्य व सुरक्षा यासारख्या गोष्टीचे सक्तीने ऑडिट झाले पाहिजे. येथे सोयी-सुविधा नाहीत तिथे त्या उपलब्ध करून देण्याबाबत सक्ती झाली पाहिजे, तसे न केल्यास दंडाची कार्यवाही झाली पाहिजेत की जेणेकरून आग आणि अपघात कमी होऊन औद्योगिक क्षेत्राचा दर्जा वाढेल. सरकारच्या कायद्याची भीती सर्वांनाच वाटली पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहिला पाहिजे. हे सर्व करणे कारखान्यांचे मालक, अधिकारी, कर्मचारी आणि संबधीत सर्व सरकारी संस्था यांच्या परस्पर समन्वय,निर्णयक्षमता,कारवाई आणि इच्छाशक्तीवर अवलंबून आहे सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास अनेक दुर्घटना टळून आकस्मित होणारे नुकसान व जीवित हानी टाळण्याचा आपला असा हेतू सिध्दीस जाईल असा विश्वास वाटतो.






















