Times Of Maharashtra Desk : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या त्यांच्या ‘धारातीर्थी यात्रे’दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत तालुक्यातील लोहगड, भीमगड आदी गडकिल्ल्यांच्या मोहिमेदरम्यान बोलताना संभाजी भिडे यांनी शरद पवार यांना राष्ट्रद्रोही ठरवत जहरी टीका केली. त्यांनी शरद पवारांवर जातीय राजकारणाचा आरोप करत अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप केला जात आहे. तसेच, राज्यातील काही प्रकल्पांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शरद पवार हे देश आणि महाराष्ट्रासाठी झिजणारे ज्येष्ठ नेतृत्व असून त्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील नेते या वादावर सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रकरणावर थेट प्रतिक्रिया देणे टाळत, वक्तव्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेतल्यानंतरच भूमिका मांडणे योग्य ठरेल, असे सांगितले. ज्येष्ठ नेत्यांबाबत बोलताना जबाबदारीने आणि संयमाने बोलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचित केले.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






















