गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील उमापूर शिवारात सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. उमापूरपासून पश्चिमेला असलेल्या खंडोबा वस्तीवरील शेतकरी ज्ञानेश्वर संतराम लाळगे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले.
दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास तालुक्यात अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला होता. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत बैलजोडीची किंमत अंदाजे १ लाख ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गेवराई तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, विजांच्या कडकडाटासह पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






















