सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा सुंदर संगम घडविणारे वृक्षमित्र विष्णू जनाबाई तानाजी वाघ लिखित ‘निपेऱ्या – गाडून घेतल्याची गोष्ट’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता वारकरी भवन, मार्केट यार्ड शेजारी, तहसील कार्यालयासमोर, विजयनगर, शिर्डी रोड, सिन्नर येथे आयोजित करण्यात आला आहे.
पेन पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे हे राहणार आहेत.

या सोहळ्यास प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड, ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, कवी नितीन चंदनशिवे, उद्योजक किशोर राठी तसेच मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुनीता सानप सांगळे करणार असून आभार प्रदर्शन प्रा. राजाराम मुंगसे करणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा सिन्नर, साहित्यभारती शाखा सिन्नर, वृक्षमित्र फाउंडेशन, बॉर्डरलेस पँथर्स, वाघ परिवार आणि मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशनासोबतच “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांनी भेटवस्तू न आणता पुस्तकाची प्रत खरेदी करून लेखकाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “आपण विकत घेतलेले पुस्तक हीच खरी भेट” हा संदेश या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
साहित्यप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांनी या विशेष सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






















