जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर वॉच मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण, वाहतूक नियमांचे उल्लंघन, महिलांचा अवमान, अश्लीलता तसेच समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून आवश्यकतेनुसार कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट, शस्त्रांचे प्रदर्शन, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि कायद्याचा अवमान करणारे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे तरुणांमध्ये चुकीचे अनुकरण वाढण्याची शक्यता असून सामाजिक वातावरणही बिघडू शकते, अशी चिंता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर सायबर पथकाकडून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. संशयास्पद अथवा आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास संबंधित व्यक्तींची ओळख निश्चित करून त्यांना समुपदेशनासाठी बोलावले जात आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कायद्यांनुसार गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून नागरिकांमध्ये डिजिटल जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तरुणांना कायद्याचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि सोशल मीडियाचा सकारात्मक व जबाबदारीने वापर वाढविणे हा आहे.
जळगाव पोलिसांनी नागरिकांना कोणताही व्हिडिओ, रील किंवा पोस्ट प्रसारित करण्यापूर्वी त्यातील मजकूर कायद्याच्या चौकटीत आहे का, याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. समाजात द्वेष, हिंसा, महिलांचा अवमान किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी कोणतीही सामग्री प्रसारित केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.






















