पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे अवघ्या २४ तासांत तब्बल ४०३ मिमी पावसाची नोंद झाली असून मागील ४८ तासांत ९१६ मिमी पाऊस कोसळला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून काही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद घाटमाथ्यावर झाली. दावडी येथे ६८८ मिमी, लोणावळा येथे ६२० मिमी, तर ताम्हिणी येथे ५३० मिमी पावसाची नोंद झाली. पुणे शहर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असून चिंचवड येथे २४ तासांत २६८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर नंदुरबार जिल्ह्यात विजेचा धक्का बसून एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील पावसामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १५ झाली आहे.
सोमवारी दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा जोडमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी लोणावळा परिसरात चिखल व दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून दोन लेन तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. तसेच कर्जत-लोणावळा रेल्वेमार्गावर दरडीचा मलबा पडल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर दुसऱ्या दिवशीही परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.
सततच्या पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात मोठे दगड व माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. लोणावळा-खंडाळा परिसरातही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF) यांनी विविध भागांत व्यापक बचावकार्य राबवले. लोणावळा, मावळ, खेड, लोहेगाव, लोणी काळभोर, माळवली आणि वाकसई परिसरातून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
लोणावळ्यातील ग्रीनलँड व्हिला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांची सुटका करण्यात आली. कार्ला येथील माउंट वेस्ट क्रिस्टा सोसायटीतील २१ रहिवाशांना लाइफ जॅकेट, दोर आणि लाइफ रिंगच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. लोहेगाव येथे पाण्यात अडकलेल्या बसमधील १२ प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली. माळवली व वाकसई परिसरातील अनेक कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
खेड तालुक्यातील रेटवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू असून शेलू परिसरात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे. लोणावळ्यातील नॉर्थ पॉइंट आणि श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात दरड कोसळल्यानंतर शोध व बचाव मोहीम सुरू आहे.
राज्यातील कुंडलिका आणि पिंजाळ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत, तर अंबा, सावित्री आणि जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीपात्रात न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस घाटमाथा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






















