वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीत भाविकांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष साहेबराव झुंबके, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, शिवचरण पांढरे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चौधरी, अग्निशमन अधिकारी अनिल देशमुख, आरोग्य अधिकारी परमेश्वर वाकोडे, स्वाती पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत भाविकांच्या जीविताची आणि आरोग्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडण्याचे आदेश दिले. दर्शन रांगा, वाहतूक, स्वच्छता, आपत्कालीन यंत्रणा, अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भाविकांना फराळ वाटप करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) चा वैध परवाना असणे बंधनकारक राहील. परवान्याशिवाय कोणालाही फराळ वाटप करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय भाविकांच्या आरोग्याचे संरक्षण, अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा, वॉच टॉवर, ग्रीन कॉरिडॉर, आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यात्रेदरम्यान प्रत्येक कर्मचारी दक्षतेने काम करून विठ्ठल भक्तांना सुरक्षित, सुखकर आणि अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव मिळावा, असे आवाहनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले






















