दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण भागातील पाच शाळांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जांभूळ, अर्जुन, प्राजक्त, कडुलिंब आणि पिंपळ या देशी प्रजातींच्या एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.
ब्लॉसम इंग्रजी माध्यम विद्यालय, श्रीगुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा, गीताबाई तात्याराव पवार आश्रमशाळा (सोनवडी), दीनदयाळ शिक्षण संस्थेची रासाईदेवी प्राथमिक आश्रमशाळा (वरवंड) तसेच नवयुग शिक्षण संस्थेचे स्व. लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालय या शाळांमध्ये हा उपक्रम पार पडला.
हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि जैवविविधतेचे संरक्षण या पार्श्वभूमीवर देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी खड्डे खोदणे, रोपे लावणे, त्यांना पाणी देणे आदी कामांत उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी शेणोलीकर (वय ९२) यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी केशव माधव विश्वस्त निधीचे विश्वस्त प्रशांत कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, संजय वळसंगकर, उत्तम बापू पवार, मकरंद पवार, शैलजा सरनोत, गुरुमुख नारंग, राजू लोखंडे, दिलीप कुदांडे, मालन दिवेकर, राजू शिर्के आणि बाळासाहेब वागसकर आदी उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उल्हास सावळेकर, प्रमोद कुलकर्णी, नंदकुमार कुलकर्णी, नरेंद्र प्रधान, योगशिक्षक सुभाष फडके, मोहन मोने, श्रीकांत पुराणिक, नाना भालशंकर, चंद्रशेखर गोरे यांच्यासह केशव माधव विश्वस्त निधीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.






















