Times of Maharashtra Desk: दिल्लीतील जीवघेण्या हवा प्रदूषणाविरोधात रविवारी इंडिया गेटवर करण्यात आलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. शुद्ध हवेची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांपैकी काहींनी चक्क पोलिसांवर मिरची स्प्रेचा मारा केला. इतकेच नाही तर, या आंदोलनात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि पोस्टर्स झळकावण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे.
नेमकं घडलं काय ?
दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी इंडिया गेट आणि कर्तव्य पथ परिसरात निदर्शने आयोजित केली होती. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता, जमावातील काही लोकांनी पोलिसांशी झटापट केली आणि त्यांच्यावर मिरची स्प्रे फवारला. यामुळे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आणि त्वचेला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नक्षलवादी कनेक्शन आणि अर्बन नक्षलचा आरोप
या आंदोलनात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आंदोलकांनी नक्षलवादी नेता माडवी हिडमा याचे फोटो असलेले पोस्टर्स हातात धरले होते आणि “माडवी हिडमा अमर रहे” अशा घोषणा दिल्या. माडवी हिडमा हा छत्तीसगडमधील अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जातो.
या प्रकारानंतर भाजपने या आंदोलनावर कडाडून टीका केली आहे. भाजपने याला अर्बन नक्षलचा कट असल्याचे म्हटले असून, प्रदूषणाच्या नावाखाली देशविरोधी अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांची कारवाई
पोलिसांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि प्रतिबंधित घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुमारे २२ जणांना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रदूषणाची स्थिती अजूनही गंभीर
एकीकडे हे राजकीय आणि हिंसक नाट्य सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती अजूनही गंभीर आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीचा AQI ३९७ च्या आसपास असून तो अतिशय खराब श्रेणीत आहे. शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी, एनसीआरमधील शहरांमध्ये प्रदूषण पातळी कमी झालेली नाही. वाढत्या प्रदूषणामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट ने ग्रॅप-३ निर्बंधांर्तगत सरकारी कार्यालयांना ५०% कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम पर्याय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.



















