Times of Maharashtra Desk: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर निवडणुकीच्या फायद्यासाठी बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. बांकुरा येथे एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना महाभारतातील दुर्योधन आणि दुशासन यांच्याशी केली. त्यांनी सांगितले, “शकुनीचा शिष्य दुशासन माहिती गोळा करण्यासाठी बंगालमध्ये आला आहे. निवडणुका जवळ आल्यावर दुशासन आणि दुर्योधन दिसतात.”
त्याचप्रमाणे, ममता बॅनर्जी यांनी पहलगाम हल्ला आणि दिल्लीतील दहशतवादी घटनांबाबतही केंद्रावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “जर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी नसतील, तर पहलगामची घटना कशी घडली? पहलगाममध्ये हल्ला तुम्हीच घडवून आणला का?”केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ मधील बंगाल निवडणुकीत घुसखोरीच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला की त्यांनी बांगलादेशच्या सीमेवर कुंपण बांधण्यासाठी जमीन दिली नाही. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राज्याने जमीन दिल्याने सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज भाजप म्हणत आहे की मी जमीन दिली नाही, तर पेट्रापोल आणि अंदलमध्ये जमीन कोणी दिली?”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआरवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “एसआयआर हा एआयच्या मदतीने होणारा घोटाळा आहे. मतदार यादीतून जर एकाही वैध मतदाराचे नाव वगळले गेले, तर तृणमूल काँग्रेस दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची घेराबंदी करेल. एसआयआरमुळे सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. वृद्धांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवणे हा राज्यातील जनता सहन करणार नाही.”






















