गणेश नारंग, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: भोसरी, पुणे, नाशिक महामार्गावरून इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंगची समस्या निर्माण झाली असून, सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत हा रस्ता अक्षरशः ठप्प होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मनमानी पार्किंग, त्यातच सीएनजी पंपावरची वाढणारी गर्दी यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे.
अरुंद झालेल्या रस्त्यामुळे कामगारांच्या बसेस, शालेय वाहनांच्या रांगा आणि पादचार्यांची झुंबड उडत आहे. मोठ्या वाहनांच्या मधून मार्ग काढताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका सतत डोके वर काढत असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

रस्त्यावर अनधिकृत वाहनांची गर्दी असल्याने रस्ता स्वच्छता देखील ठप्प झाली आहे. धूळ, कचरा आणि अडथळे यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. नागरिकांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जयदीप करपे यांनी महापालिका व वाहतूक विभागाला तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अनधिकृत पार्किंग हटवणे, वाहतूक शिस्त प्रस्थापित करणे आणि रस्ता मोकळा करण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.






















