ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :
केंद्र सरकारच्या अत्याधुनिक ‘सीईआयआर’ पो र्टल आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने ब्रह्मपुरी पोलिसांनी परिसरातून गहाळ झालेले तब्बल १५ मौल्यवान मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश मिळवले आहे. हे हस्तगत केलेले सर्व मोबाईल पोलीस प्रशासनातर्फे त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ आणि चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून आणि ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ प्रणालीचा प्रभावी वापर करत तांत्रिक तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून अथक परिश्रमांनंतर एकूण १५ मोबाईल्सचा शोध लावला.
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात मूळ मोबाईल धारकांना त्यांचे फोन परत देण्यात आले. अनेक दिवसांपूर्वी हरवलेले आपले महागडे फोन पुन्हा हातात मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. नागरिकांनी या तत्पर कारवाईबद्दल ब्रह्मपुरी पोलिसांचे जाहीर आभार मानले.
सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, प्रवीण भिवगडे, इरशाद खान आणि वशिष्ठ रंगारी यांच्या पथकाने केली.






















