दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कामकाजातील दिरंगाई याविरोधात आज नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पक्ष (भाजपा), आरपीआय (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट) तसेच इतर मित्र पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन गटनेते श्री. योगेश भैय्या प्रेमसुखजी कटारिया यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलकांनी नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध करत मुख्याधिकारी यांना नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत जाब विचारत मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.

यानंतर आंदोलकांच्या वतीने मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनास शहरातील सर्व नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















