देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : भारतीय जैन संघटना (BJS) च्या राष्ट्रीय संवाद यात्रेअंतर्गत विदर्भ विभागीय कार्यकर्ता संवाद कार्यक्रम अकोल्यातील ओसवाल भवन येथे उत्साहात पार पडला. या वेळी समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना बीजेएसचे राष्ट्रीय सचिव दीपक चोप्रा यांनी जैन समाजातील विवाहाच्या वाढत्या वयाच्या समस्येकडे लक्ष वेधले. विवाहयोग्य युवक-युवतींचे योग्य वयात विवाह होत नसल्याने कुटुंबांमध्ये विविध अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी योग्य वेळी विवाह घडवून आणल्यास भविष्यातील सामाजिक समस्या टाळता येतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी राज्याध्यक्ष केतन शहा आणि महासचिव प्रवीण पारख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या संवाद यात्रेअंतर्गत बीजेएसचे पदाधिकारी देशातील १३ राज्यांमध्ये जाऊन जैन समाजाशी संवाद साधत आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला यांच्या नियोजनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
यामध्ये युवती सक्षमीकरण, मूल्यवर्धन शिक्षणाचा प्रसार तसेच राज्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन यांच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेत सहभाग यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत.
तसेच विवाहयोग्य युवक-युवतींसाठी ‘परिणय पथ’ या विशेष कार्यक्रमाचे पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजन करून योग्य जुळवणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष कीर्ती कुमार वायकोस, सन्मती जैन, प्रा. सुभाष गादिया, विमल जैन, निलेश गोठी, ममता जैन, प्रेरणा शाह यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






















