विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित , शोषित आणि कष्टकरी घटकांचे दुःख आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते , तर ते जनतेचे कवी , समाजप्रबोधनकार आणि परिवर्तनाचे योद्धे होते . त्यांच्या साहित्याने लाखो सामान्य माणसांना आत्मविश्वास दिला आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली . म्हणूनच महाराष्ट्रात १ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला . त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते . अत्यंत गरिबी , दारिद्र्य आणि सामाजिक विषमता यामध्ये त्यांचे बालपण गेले . लहान वयातच कुटुंबासह ते मुंबईत आले . उदरनिर्वाहासाठी त्यांनी मजुरी , हमाली , बांधकामावरील कामे अशा अनेक कष्टप्रद कामांत हातभार लावला . शिक्षणाची संधी मर्यादित असली तरी जीवनाच्या विद्यापीठातून त्यांनी समाजाचे वास्तव जवळून अनुभवले . हाच अनुभव त्यांच्या साहित्याचा पाया ठरला .
मुंबईतील गिरणगाव , झोपडपट्ट्या आणि कामगार वस्त्यांतील जीवन त्यांनी जवळून पाहिले . श्रमिकांचे प्रश्न , अन्याय , गरिबी , उपासमार आणि विषमता यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले . त्यांनी लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार केला . त्यांची भाषा ही लोकभाषा होती . त्यामुळे त्यांचे साहित्य थेट जनतेच्या मनाला भिडले . अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेचा प्रभावी वापर करून समाजजागृती केली . पोवाडे , लावण्या , वगनाट्ये , लोकनाट्ये आणि शाहिरी यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता , श्रमिकांचे हक्क , राष्ट्रीय एकात्मता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला . त्यांच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत असे . ते व्यासपीठावर उभे राहिले की हजारो श्रोते मंत्रमुग्ध होत असत .
भारतीय स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता . त्यांनी श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविला . समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा , प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा आणि जात , धर्म , भाषा यापलीकडे मानवतेचा विचार रुजावा , ही त्यांची भूमिका होती .
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांनी मोठे योगदान दिले . मराठी अस्मिता जागविण्यासाठी त्यांनी असंख्य शाहिरी कार्यक्रम केले . त्यांच्या पोवाड्यांनी आणि गीतांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या चळवळीला नवे बळ दिले . जनतेला प्रेरणा देणारा त्यांचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या इतिहासात आजही जिवंत आहे . अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अत्यंत विपुल आहे . त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या , २० पेक्षा अधिक कथासंग्रह , अनेक लोकनाट्ये , पोवाडे , लावण्या , प्रवासवर्णने आणि शाहिरी साहित्य निर्माण केले . त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू नेहमी सामान्य माणूस होता . त्यांनी कधीही राजदरबारातील किंवा श्रीमंतांच्या जीवनाचे चित्रण केले नाही . त्यांच्या लेखणीत झोपडपट्टी , शेतमजूर , हमाल , कष्टकरी , भटके , वंचित आणि दलित समाज जगत होता .
त्यांच्या साहित्यकृतींपैकी ‘ फकिरा ‘ ही कादंबरी मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती मानली जाते . अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एका सामान्य माणसाची संघर्षगाथा त्यांनी या कादंबरीत प्रभावीपणे मांडली आहे . या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला . आजही ती मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून अभ्यासली जाते . अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे , तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली . त्यांनी सोव्हिएत संघाचा दौरा केला . त्यांच्या साहित्याचे अनेक विदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले . भारतीय लोकसाहित्य आणि श्रमिक जीवनाचे वास्तव जगासमोर मांडणाऱ्या लेखकांमध्ये त्यांचा उल्लेख आदराने केला जातो .
त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आजही समाजाला दिशा देणारे आहे — ” ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे , तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे . ” या एका वाक्यात त्यांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले . कोणताही समाज , कोणतेही राष्ट्र किंवा कोणतीही अर्थव्यवस्था कष्टकरी वर्गाशिवाय उभी राहू शकत नाही , हा संदेश त्यांनी दिला . अण्णाभाऊ साठे हे समतेचे पुरस्कर्ते होते . समाजातील भेदभाव , जातीय विषमता आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने लेखणी चालविली . त्यांनी मानवतेला सर्वोच्च स्थान दिले . त्यांच्या साहित्यामध्ये आशावाद , संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेश आहे . त्यामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच समकालीन वाटते .
१८ जुलै १९६९ रोजी अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले . मात्र त्यांचे साहित्य , त्यांची शाहिरी आणि त्यांचे विचार आजही लाखो युवकांना प्रेरणा देत आहेत . महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठे , संशोधन संस्था आणि साहित्य अभ्यासक त्यांच्या साहित्याचा अभ्यास करीत आहेत . त्यांच्या नावाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात . आजच्या काळात सामाजिक समता , संविधानिक मूल्ये , श्रमाचा सन्मान आणि सर्वसमावेशक विकास यांची चर्चा होत असताना अण्णाभाऊ साठे यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात . त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला , कष्टाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन बनविले . म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हे , तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि भारताचे प्रेरणास्थान आहेत .

चंद्रकांत सरस्वती प्रकाश शेळके
तहसीलदार, बीड






















