महाड | प्रतिनिधी:(दिनेश चाफळकर)
महाडमध्ये पाणीटंचाईची झळ; तीन भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरूकोथुर्डे धरणात 20% तर कुर्ला धरणात 30% साठा; कमी दाबामुळे पंचशील नगरसह अनेक भागांना फटका
महाड शहरात पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाली असून धरणांतील साठा घटल्याने आणि एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नगर परिषदेला तीन भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. शहरातील पंचशील नगर, विसावा ते चांभार खिंड आणि प्रभात कॉलनी ते सावित्री मार्ग या भागांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
महाड तालुक्यात दरवर्षी 3,000 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडत असला, तरी पाणीसाठा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे उन्हाळा सुरू होताच शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात केवळ 20 टक्के, तर कुर्ला धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
शहरासाठी रानबाजीरे धरणातूनही पाणीपुरवठा केला जातो; मात्र औद्योगिक महामंडळाकडून कमी दाबाने पाणी मिळत असल्याने अनेक भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नगर परिषदेला टँकरच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
> “शहरातील काही भागांत कमी दाबामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.”
— रोहित भोईर, पाणीपुरवठा विभाग, महाड नगर परिषद
दरम्यान, महाड शहराजवळ उभारण्यात येत असलेल्या कोथेरी धरणाचे घळभरणीचे काम यावर्षी पूर्ण झाल्यास, पुढील वर्षापासून शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
दररोज 65 लाख लिटरची गरज
महाड शहराला दररोज सुमारे 65 लाख लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र उपलब्ध साठा झपाट्याने घटत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाड नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील काही आठवड्यांत पावसाळ्यापर्यंत साठा टिकवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.






















