सारनाथ अवचार (वाशिम प्रतिनिधी) : वाशिम जिल्ह्यातील पार्डी ताड येथील श्री गोविंद विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी व कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद ठाकरे होते. त्यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनोदी बालनाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. प्रथमेश कातडे, कार्तिक गावंडे, सार्थक मिरासे, समर्थ मस्के, आरव जाधव, रितेश ढळे, कुणाल लांभाडे, शुभ्रा सावरकर, ईश्वरी शेंद्रे, जयश्री जाधव, तन्वी येलकर व नंदिनी गावंडे यांनी उत्कृष्ट अभिनय करत कार्यक्रमात रंगत आणली.
तसेच अनुष्का भगत, ईश्वरी कुरवाडे व मोहिनी बोथे यांनी ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत सुंदर गायन व नृत्याद्वारे सादर करून सर्वांना भारावून टाकले.
यानंतर हर्षदा सावके, प्रणाली येलकर, सानिका पानभरे, गौरी कुरवाडे, ज्ञानेश्वरी सावके, श्रद्धा लांभाडे, श्रावणी कुटे, दिव्या भगत व अक्षरा पानभरे या विद्यार्थिनींनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली.
यावेळी मीना नानुटे व अध्यक्ष सदानंद ठाकरे यांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश ठाकरे व अणेश मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीना नानवटे यांनी मानले.
मराठी भाषेच्या गौरवाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



















