विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गिरणा नदी आणि तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी आणि परिसरात सकाळी पाच वाजल्यापासून ही मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईत एकूण ४० वाहने जप्त करण्यात आली असून त्यात ३२ ट्रॅक्टर आणि ८ ट्रक-डंपर यांचा समावेश आहे. सर्व जप्त वाहने पोलिस मुख्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत.
संयुक्त पथकाची पहाटे धाड
गेल्या काही दिवसांपासून गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.
ही मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पहाटे गावातील नागरिक झोपेत असतानाच पोलिसांनी विविध गल्लीबोळांतून फिरत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.
संशयित वाहनांवर विशेष नजर
-
पूर्वी वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल असलेल्या वाहनांची विशेष छाननी
-
नदीपात्रातून थेट वाळू भरून आणणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक व डंपरची चौकशी
-
वैध परवाना नसल्याचा संशय असलेल्या वाहनांची तात्काळ जप्ती
कारवाई सुरळीत पार पडावी यासाठी पथकासोबत वाहनांच्या चाव्या तयार करणारा कारागीर ठेवण्यात आला होता. त्यामुळे चालकांनी चावी न दिल्यास किंवा वाहन लॉक करून ठेवल्यासही जप्तीची प्रक्रिया अडथळ्याविना पूर्ण करता आली.
काही ठिकाणी नाराजीचा सूर
पहाटे अचानक मोठ्या संख्येने पोलिस गावात दाखल झाल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे १० वाजेपर्यंत मोहीम सुरू होती. जप्त वाहने पोलिस ताब्यात नेत असताना काही ठिकाणी ती वेगाने चालवली जात असल्याची तक्रार दुचाकीस्वारांनी केली. त्यामुळे काहींना रस्त्याच्या कडेला थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू
सध्या जप्त वाहनांची कागदपत्रे तपासली जात असून संबंधितांकडे वैध वाळू वाहतूक परवाना आहे का, याची खात्री केली जात आहे.
-
परवाना नसल्यास किंवा नियमभंग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई
-
यापूर्वीचे गुन्हे आढळल्यास गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया
-
अपूर्ण कागदपत्रांच्या प्रकरणांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे अहवाल
पुढेही मोहिमा कायम
अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुढील काळातही अशाच धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नदीपात्रातील अनियंत्रित वाळू उपशामुळे पाणीपातळी घटणे, किनाऱ्यांची धूप, जैवविविधतेवर परिणाम अशा गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याने जिल्हाभरातून या कारवाईकडे लक्ष लागले आहे.






















