प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी झिंगानूरसह परिसरातील नागरिकांचे तालुक्याशी संपर्क तुटला असून मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सुमारे ४५ ते ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा रापटा दरवर्षी पावसाळ्यात खराब होत असल्याने श्रमदानातून त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. यावर्षीही वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून सिमेंट काँक्रीट करून रापटा दुरुस्त केला होता. मात्र सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्व काम काही दिवसांतच वाहून गेले.
रापट्याचा मोठा भाग पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना ये-जा करणे धोकादायक बनले आहे. मागील चार दिवसांपासून एसटी बस सेवा झिंगानूर येथेच थांबली असून सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या मार्गावरून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षणासाठी, शासकीय कामांसाठी तसेच रुग्णांना ग्रामीण रुग्णालय व तालुका मुख्यालयात उपचारासाठी जाणे अत्यावश्यक असते. मात्र रस्ता बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, औषधे व कृषी अवजारे आणण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, मंगळवारपासून परिसरात वीजपुरवठाही खंडित असल्याने नागरिकांचे हाल अधिक वाढले आहेत. झिंगानूरपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नैगुंडा नाल्यावरील रापटा वाहून गेल्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरील नाल्यांवर कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे. तरीही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून नैगुंडा नाल्यावरील रापट्याची दुरुस्ती करावी तसेच कायमस्वरूपी पूल उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.






















