ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या नावाखाली तब्बल चार वेळा दिवसभर उपाशी ठेवून शेवटच्या क्षणी ऑपरेशन पुढे ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधित रुग्ण रुग्णालयात दाखल असून, सतत होणाऱ्या विलंबामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार पासी यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगून वारंवार तयारी करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत ऑपरेशन पुढे ढकलण्यात आले. कधी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, तर कधी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले. काही वेळा डॉक्टर रजेवर असल्याचेही सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधार मानल्या जाणाऱ्या या रुग्णालयात अशी परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी विश्वास कुणावर ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित रुग्णाचे ऑपरेशन महात्मा गांधी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणार होते. मात्र, कागदपत्रांतील त्रुटी, उशिरा झालेली नोंदणी आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण न झाल्यामुळे विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, ऑपरेशनपूर्वी फिटनेस चाचणी, रक्त तपासण्या आणि इतर वैद्यकीय अहवाल आवश्यक असतात. गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने काही वेळा विलंब होणे अपरिहार्य असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, “चार वेळा उपाशी ठेवून शेवटी ऑपरेशन रद्द करणे हा कोणता वैद्यकीय प्रोटोकॉल?” असा सवाल आता नातेवाईकांकडून उपस्थित होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.






















