Times of Maharashtra Desk: गणेश नारंग (पिंपरी चिंचवड प्रतिनिधी)
पिंपरी गावात महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका गाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरकारी विद्युत निरीक्षकांच्या चौकशीत महावितरणचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार दोषी असल्याचे स्पष्टपणे नमूद झाले असूनही, पिंपरी पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवण्यास नकार देत केवळ NCR दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विद्युत निरीक्षकांनी 30 जून 2025 रोजी जारी केलेल्या अहवालात DP बॉक्सजवळ सैल वायर, सुरक्षा साधनांची कमतरता आणि फिक्स्ड पिलरमधील दोष यामुळेच गाईचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. महावितरणनेही त्यांच्या लेखी पत्रात त्या दिवशी तांत्रिक दोष झाल्याची कबुली दिली आहे.
नवीन Bharatiya Nyaya Sanhita (BNS) 2023 नुसार या प्रकरणात कलम 324(2) (पशुधनाचे नुकसान) आणि कलम 325(2) (जनावरांचा मृत्यू) ही दोन्ही कॉग्निजेबल व गंभीर गुन्ह्यांची कलमे लागू होतात. त्यामुळे FIR दाखल करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असतानाही पिंपरी पोलिसांनी ही कलमे टाळून अप्रस्तुत BNSS 211 लावले आहे, ज्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा पेट घेत आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी संताप व्यक्त करत सांगितले, “सरकारी अहवाल, पुरावे, महावितरणची कबुली—सर्व कागदपत्रे देऊनही सहा महिने FIR टाळली जात आहे. हे न्याय न देण्याचे आणि प्रकरण दडपण्याचे स्पष्ट उदाहरण आहे.”
ग्रामस्थांनीही पोलिसांच्या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया देत FIR नोंदवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरकारी अहवालात दोष सिद्ध असून महावितरणनेही जबाबदारी मान्य केलेली असताना FIR नोंद न करणे हे पोलिस प्रशासन व महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.






















