Times of Maharashtra Desk: नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ एक नवीन खोल दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे की या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हा खोल दाबाचा पट्टा सुमारे १७ किमी/ताशी वेगाने उत्तर-वायव्येकडे (एनएनडब्ल्यू) सरकेल आणि ३० नोव्हेंबर २०२५ च्या सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू-पुदुच्चेरी-दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल.ही प्रणाली सध्या अक्षांश ६.७° उत्तर आणि रेखांश ८२.१° पूर्व जवळ आहे. या संदर्भात, आयएमडीने २७, २८ आणि २९ नोव्हेंबरसाठी चेन्नई, नागपट्टिनम, तिरुवल्लूर आणि तंजावरसह तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट सांगितला आहे.
प्रशासनाचा सतर्क राहण्याचा इशारा
प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही आपत्तीच्या वेळी नुकसान कमी करण्यासाठी हवामान खात्याने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मलाक्काच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेले चक्रीवादळ सेन्यार आता कमकुवत झाले आहे आणि आता मलेशियाकडे सरकत आहे. मलेशियाने उत्तर मलेशियामध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटांचा इशारा सांगितलं आहे. या भागात पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि किनारी आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.आयएमडीने म्हटले आहे की सेन्यारचा आता भारताला कोणताही धोका नाही, परंतु बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या नवीन खोल दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो आणि आयएमडी त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.






















