Times of Maharashtra :
राज्यातील अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा स्पष्ट शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जालन्यात बोलताना त्यांनी या योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते रखडले होते. यापैकी नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यात आला असून, डिसेंबर व जानेवारीचे पैसेही लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. अद्याप केवायसी न केलेल्या तसेच अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे काहींचा लाभ बंद होण्याची शक्यता असली, तरी योजना बंद होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
यासोबतच त्यांनी “लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार” अशी घोषणाही केली. म्हणजेच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पुढील टप्प्यात अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.






















