Times of Maharashtra : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपसह निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी सुरू असलेली रस्सीखेच अधिकच तीव्र होत चालली आहे.
सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपकडून ‘घोडेबाजार’ सुरू करण्यात आला असून, पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार केवळ राजकीय अनैतिकतेचा नसून, थेट संविधान आणि लोकशाही मूल्यांवरचा हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. “निवडणूक आयोगावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आयोग पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अधिक गंभीर आरोप करताना सपकाळ म्हणाले की, कार्यकर्त्यांना धमकावणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आणि निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करणे, हे प्रकार सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी काँग्रेसची ठाम भूमिका आहे. त्यांनी आर्थिक भ्रष्टाचार, घटनात्मक अधिकारांचा गैरवापर आणि व्यवस्थात्मक दबाव या तीन मुद्द्यांवर नार्वेकर दोषी असल्याचा दावा करत राष्ट्रपतींनी त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केली.
राज्यात सध्या निवडणुकांचा दुसरा टप्पा सुरू असून ‘फ्री अँड फेअर’ निवडणुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला. नगरपरिषद निवडणुकांमध्ये खुलेआम पैसा फेकला गेला, लोकशाहीचा तमाशा झाला, अशी टीका करत “बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया” हीच आजची निवडणूक संस्कृती बनली असल्याचे ते म्हणाले.
लोकशाही ही सत्तेची नव्हे तर लोकांची प्रक्रिया आहे. मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून उमेदवारांनी मतांची भीक मागायची असते, मत विकत घेण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे स्पष्ट मत सपकाळ यांनी मांडले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील नेहरूंच्या समावेशक राजकारणाचा दाखला देत, सत्तेच्या हव्यासापोटी आज लोकशाही गिळंकृत केली जात असल्याचा आरोप केला.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही पुरावे मागण्याचे नाटक सुरू आहे, असा आरोप करत त्यांनी काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्याचाही दावा केला. टोकन देऊनही उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले नाहीत, अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला, हे प्रकार गंभीर असल्याचे ते म्हणाले.
संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी पक्षनिष्ठा सोडली पाहिजे. मात्र राहुल नार्वेकर यांनी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्याचा गैरवापर केला,” असा आरोप करत सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वेळेत सावध न झाल्यास इतिहास आपल्याला माफ करणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.






















