Times of Maharashtra Desk :कोंढवा-कौसरबाग मधील लढत आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर न राहता ती ‘स्वाभिमानाच्या’ मुद्द्यावर येऊन ठेपली आहे. या प्रभागात काँग्रेसचे उमेदवार काशिफ सय्यद यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा समाचार घेत काशिफ सय्यद यांनी विरोधकांना निरुत्तर केले आहे. त्यांच्या या रोखठोक भाषणाची सध्या कोंढव्यात जोरदार चर्चा आहे.
दुटप्पी राजकारणावर प्रहार प्रभाग १९ हा प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग आहे. प्रचारादरम्यान बोलताना काशिफ सय्यद यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. ते म्हणाले, “एकिकडे तुमचे नेते मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भाषा करतात, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारी विधाने करतात आणि दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते त्याच समाजात येऊन मतांचा जोगवा मागत आहेत. जर तुम्हाला आमची अजान आणि भोंगे चालत नाहीत, तर मग आमची मते तरी का हवी आहेत? हा उघड उघड जातीभेद आणि मतलबीपणा नाही का?” त्यांच्या या प्रश्नामुळे विरोधकांची कोंडी झाली असून, मतदारांमध्येही याबाबत संतापाची लाट आहे.
“खरा हिंदू धर्म सहिष्णुता शिकवतो” केवळ विरोधकांवर टीका न करता, काशिफ सय्यद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील उदात्त शिकवणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले, “हिंदू धर्म हा अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. ‘इतर धर्मांचा आदर करणे’ हीच हिंदू धर्माची खरी शिकवण आणि संस्कृती आहे. मात्र, काही पक्ष राजकीय पोळी भाजण्यासाठी द्वेष पसरवत आहेत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या आणि संतांच्या विचारांना मानणारे लोक आहोत, जिथे सर्वधर्मसमभावाला स्थान आहे.”
कोंढव्याच्या एकतेचा आवाज कोंढवा परिसरात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, मनसेच्या ‘भोंगे’ प्रकरणातील भूमिकेमुळे येथील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता, अशी भावना नागरिकांची आहे. अशातच काशिफ सय्यद यांनी घेतलेली भूमिका ही केवळ एका धर्माची नसून, ती संविधानाची आणि सामाजिक ऐक्याची भूमिका असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.मतदारांचा कल स्पष्ट “ज्यांना आमचा धर्म आणि संस्कृती मान्य नाही, त्यांना आम्ही मते का द्यावीत?” हा विचार आता मतदारांच्या मनात घर करत आहे. काशिफ सय्यद यांनी विकासासोबतच समाजाच्या अस्मितेचा मुद्दा मांडल्याने, त्यांना मिळणारा पाठिंबा अधिकच वाढला आहे. काँग्रेसच्या ‘हाता’ला साथ देऊन नागरिक द्वेष पसरवणाऱ्या विचारसरणीला नाकारतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















