दिनेश चाफळकर ( रायगड प्रतिनिधी ) : महाड तालुक्यातील महाड परिसरात सावित्री नदी व गांधारी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सुरू असलेले उत्खनन आता दिवसाढवळ्याही खुलेआमपणे होत असल्याने महसूल व पर्यावरण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत रेती उत्खननास परवानगी नसतानाही महाड शहरातील भीमनगर परिसरात गेल्या महिनाभरापासून जेसीबी व पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने नदीपात्रात उत्खनन सुरू आहे. संबंधित ठिकाणी तलाठी कार्यालय असतानाही कारवाई होत नसल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांच्या मते, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून तिची वाहतूक केली जात आहे. तसेच उत्खनन प्रक्रियेतून वेगळा होणारा रेजगा (दगड-गोटे) याचीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत स्पष्टता नसल्याने महसूल खात्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, अवैधरित्या होत असलेल्या उत्खननामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना बिघडत असून पर्यावरण संतुलन धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी कमी होणे, किनाऱ्यांची धूप वाढणे आणि जैवविविधतेवर परिणाम होणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणात तहसीलदार, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





















