रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसील प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. तालुक्यात विविध ठिकाणी सातत्याने धाडी टाकून अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई केली जात आहे.
तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने दि. २७ फेब्रुवारी रोजी मौजा कुर्झा येथे धडक कारवाई करत अवैधरित्या रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. सदर ट्रॅक्टर श्री. सौरभ अनिल रामटेके, रा. कुर्झा वार्ड ब्रह्मपुरी यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त वाहन तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी येथे जमा करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी श्री. भूपेन गौरे, महसूल सेवक श्री. धनपाल बोरघरे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
तक्रारदारच कारवाईत सापडल्याने चर्चा
विशेष म्हणजे, अवैध रेती तस्करीविरोधात नागरिकांच्या सह्या गोळा करून तहसील कार्यालयात निवेदन देणाऱ्यांमध्ये सौरभ रामटेके यांचा पुढाकार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. रेती तस्करी थांबवावी, अशी मागणी करणारी व्यक्तीच अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईत सापडल्याने तालुक्यात आश्चर्य आणि खळबळ व्यक्त होत आहे.
सार्वजनिकरित्या अवैध धंद्याविरोधात भूमिका मांडणारी व्यक्तीच कारवाईत अडकणे, ही बाब प्रशासनाच्या मोहिमेला वेगळेच परिमाण देणारी ठरत आहे. “दाखवायचे एक आणि करायचे दुसरे?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
यापूर्वीही एक ट्रॅक्टर जप्त
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीही महसूल पथकाने आणखी एक ट्रॅक्टर जप्त केला होता. सदर वाहन श्री. प्रफुल सहादेव मेश्राम, रा. बेलपातळी यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी श्री. चंद्रकांत ठाकरे, श्री. घनश्याम राऊत व श्री. तुषार गिरडकर यांनी सहभाग घेतला.
दोन्ही जप्त वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली असून संबंधितांवर महसूल व खनिज नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
प्रशासनाची कठोर भूमिका
तहसील प्रशासनाच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे अवैध रेती तस्करांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षण, नदीपात्रांचे संवर्धन आणि शासनाच्या महसुलाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तहसीलदार सतीश मासाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध उत्खनन किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास ती तात्काळ प्रशासनाला द्यावी. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम प्रभावीपणे राबविणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.






















