गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील हजारो महिलांना ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान ई-केवायसी न झाल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रखडले असून, या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गढी येथील रागिनी प्रतिष्ठानच्या कार्यवाहक रागिनी मुळे यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
तालुक्यातील पोस्ट खात्यांशी संबंधित अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, दरमहा मिळणारे १५०० रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. विशेष म्हणजे, लाभार्थी महिलांनी पोस्ट कार्यालयात चौकशी केली असता, ‘केवायसीसंदर्भात कोणतेही आदेश नाहीत’ असे सांगण्यात आल्याची तक्रार आहे. मात्र शासन स्तरावर ई-केवायसी सक्तीची करण्यात आल्याने, निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनुदान थांबले आहे.
याशिवाय, तालुक्यातील अनेक महिला मजुरीसाठी स्थलांतरित झाल्याने त्या वेळेत ई-केवायसी करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अनुदान मिळवण्यासाठी महिलांना महिला व बालकल्याण विभागाच्या वारंवार चकरा माराव्या लागत असूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे.
या अनुदानावरच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने, निधी रखडल्यामुळे दैनंदिन खर्च, औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. संबंधित विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे सामान्य व गरजू महिलांवर अन्याय होत असल्याचे रागिनी मुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, ‘लाडक्या बहिणी’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करून पोस्ट खातेदार महिलांसाठी विशेष मुदतवाढ जाहीर करावी. तसेच मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित महिलांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















