शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना बसला असून एकूण 480 शेतकरी बाधित झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार सुमारे 392 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः बाजरी, मका, रब्बी ज्वारी आणि गहू ही पिके आडवी पडून उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच केळी व पपईसारख्या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र दिसून आले.

शेतकऱ्यांनी आधीच उत्पादन खर्च करून पिकांची निगा राखली असताना अचानक आलेल्या या आपत्तीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असल्याने या नुकसानीमुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित गावांतील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर शासनाकडून मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, “सदर माहिती प्राथमिक स्वरूपाची असून सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल.”
शेतकरी वर्गाने तात्काळ आपल्या शेतातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मदत प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.






















