गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निबंध स्पर्धेत एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आली. प्राथमिक गटात सृष्टी जितेंद्र सुळे हिने प्रथम, सिद्धांत मेघशाम पांचाळ याने द्वितीय तर दिव्या धर्मराज मुटके हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात प्रताप गोवर्धन चव्हाण प्रथम, यश शरद पिंपळे द्वितीय आणि माधुरी मच्छिंद्र हातागळे तृतीय ठरले. विजेत्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व ड्रॉइंग किट्स देऊन गौरव करण्यात आला, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

याच औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा चव्हाणवाडी येथे कॉपीमुक्त चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसाहेब लक्ष्मण शेळके यांनी भीमज्योती जन्मोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची गरज स्पष्ट केली. प्रमुख उपस्थित प्रा. दीपक डोंगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचे आवाहन केले.
विशेष व्याख्याते प्रा. शरद सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत चव्हाणवाडीच्या शिस्तबद्ध अभ्यास संस्कृतीचे कौतुक केले. “गावात बौद्ध समाजाचे एकही घर नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे त्यांनी नमूद केले. सायरन वाजल्यानंतर मुले नियमित अभ्यासाला बसतात, ही शिस्त इतर गावांसाठी आदर्श असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. सरग सर, पोलीस पाटील अंकुश हातागळे, लिपिक विलास हातागळे, ज्येष्ठ नागरिक रोहिदास पिंपळे यांच्यासह गावातील माता-भगिनी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. सुरज शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद यादव यांनी केले. शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा ठरला.






















