परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार २०२६’ पटकावला आहे. अवघ्या कमी वयात उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करत त्यांनी आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
जमीर पठाण हे गंगाखेड शहरात ‘दोस्ती एजन्सी’ या नावाने व्यवसाय चालवत असून, त्यांच्याकडे डी.ए. कॅबिनेट मॅन्युफॅक्चरर (साउंड सिस्टीम) ची एजन्सी आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या एजन्सीला ‘मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ या श्रेणीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि. १९ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे आयोजित भव्य गौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते जमीर पठाण यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांचे वडील सुलेमान पठाण, काका बाबा पठाण, बंधू सरवर पठाण, आमिर पठाण तसेच मामा इस्माईल शेख आणि इसाक शेख आदी उपस्थित होते.
जमीर पठाण यांच्या या यशामुळे आवलगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या व्यवसायात प्रगती साधत ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली आहे.
डी.ए. कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही साउंड सिस्टीम कॅबिनेट तयार करणारी विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या चार वर्षांपासून जमीर पठाण आपल्या बंधूंना सोबत घेऊन व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या या यशोगाथेमुळे अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
जमीर पठाण यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.





















