जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह राजवडी, बिजवडी, पाचवड आणि परिसरातील वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ एप्रिल २०२६ रोजी बुधवारी रात्री घडली. हस्तनपूर येथील शेतकरी विकास खताळ यांच्या गोठ्यात देशी जातीच्या खिल्लार गायी बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी बिबट्याने गोठ्यावर हल्ला करून एका वासराला ओढून नेले आणि गंभीर जखमी केले. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेपूर्वीही परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मोगराळे, पाचवड, अनुभलेवाडी आणि हस्तनपूर परिसरात बिबट्याच्या खुणा आढळल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हस्तनपूरचे सरपंच तानाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी वनविभागाने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री बाहेर पडणे कठीण झाले असून आता जनावरांवरही हल्ले होऊ लागले आहेत. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी,” अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.






















