गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील बालग्राम परिवाराचा लाडका विकास आणि अमरावतीची अनुष्का यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत साधेपणाने आणि तितक्याच भावनिक वातावरणात संपन्न झाला.
एका अनाथ मुलाचा अनाथालयापासून ते एका नामांकित कंपनीतील उच्च पदापर्यंतचा आणि आता हक्काचं घर मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

विकासचे बालपण बालग्राम परिवाराच्या छायेत गेले. आई-वडिलांचे छत्र नसताना बालग्रामने त्याला केवळ निवाराच दिला नाही, तर माया, संस्कार आणि शिक्षणाचे बळ दिले. आपल्या कष्टाच्या आणि बालग्रामने दाखवलेल्या योग्य मार्गाच्या जोरावर विकासने पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केले.
आज तो एका नामांकित कंपनीत सन्मानाने नोकरी करत असून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे. विवाह सोहळ्यादरम्यान विकासच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास उपस्थितांचे मन जिंकून घेणारा होता.
“कधीकाळी आपण एकटे आहोत ही जाणीव असायची, पण आज अनुष्काच्या रूपाने मला हक्काचं ‘आपलं माणूस’ मिळालं आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
बालग्राम परिवारासाठी हा क्षण केवळ एका लग्नाचा नसून त्यांनी जपलेल्या एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान देणारा ठरला.
भपकेबाजपणाला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. एका अनाथ बालकाच्या आयुष्यातील पोकळी आज प्रेमाने आणि नात्याच्या विश्वासाने भरून निघाली आहे.
या विवाह सोहळ्याला बालग्राम परिवारातील सदस्य आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास आणि अनुष्का या नवदांपत्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे पुढील जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाचे जावो, अशी सदिच्छा गेवराई येथील बालग्राम परिवाराने व्यक्त केली आहे.






















