गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. चंद्रशेखर माधवराव गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशभक्तीचा जयघोष केला.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास मुंडे, मधुकरराव गायकवाड, राजाराम कांबळे, राहुल लोणकर तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नारायणराव बाबासाहेब जाधव, ग्रामसेवक अण्णासाहेब ससाने आणि सखाराम पोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गावातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या प्रसंगी डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी समाजाच्या विकासात कामगारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व गावकऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.






















