हडपसर (प्रतिनिधि धीरज महानगरे): प्रशासन फक्त पत्रे आणि सूचना फलक लावून जबाबदारी झटकत असल्याचा राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांचा आरोप
हडपसर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्याने धावून जाणारे राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष तथा समाजसेवक पै. उल्हास भाऊ तुपे यांनी ससाणेनगर येथील कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ससाणेनगरकडे जाणाऱ्या कॅनाल पुलाचा पाया खचल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर पै. उल्हास तुपे यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून काम सुरू करण्यास विलंब होत असल्यामुळे त्यांनी संबंधित ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाने काम सुरू केले, मात्र काही दिवसांतच ते काम पुन्हा बंद करण्यात आले. सध्या अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात अत्यंत थर्ड क्लास दर्जाची पत्रे लावून त्यावर सूचना फलक उभे केले आहेत. मात्र प्रत्यक्षात धोकादायक स्थिती कायम असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.


सद्य स्थितीनुसार रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात एखाद्या वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर गेला अथवा त्या पत्र्यांना धडक बसली, तर वाहन थेट कॅनालमध्ये कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना उल्हास तुपे यांनी व्यक्त केली आहे.
याचबरोबर हडपसर गावातील जुना पूल भविष्यात मेट्रो प्रकल्पासाठी पाडण्यात येणार असल्याची चर्चा असताना, या पुलावर तब्बल सहा कोटी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे, असा सवालही पै. उल्हास तुपे यांनी उपस्थित केला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवून प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, तसेच नागरिकांची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुढे पावसाळा सुरू होणार असल्याने या पुलाच्या परिसरात मोठा अपघात होण्याची भीती अधिक वाढली आहे. रोज हजारो नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत फक्त सूचना फलक लावून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप पै. उल्हास तुपे यांनी केला आहे.
कित्येक महिन्यांपासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. निधी मंजूर होऊनही काम पूर्ण का केले जात नाही? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? सर्वसामान्य माणसाच्या जीवाला काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ न करता प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून पुलाचे रखडलेले काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांनी दिला आहे.






















