नाशिक जिल्हा ,निफाड तालुका (प्रतिनिधी योगेश कर्डिले ,उत्तम जाधव ) :
नाशिक, 29 मे 2026: विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे दोन दिग्गज नेते आमने-सामने आले आहेत. माजी नगरसेवक निशेश बोरा आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गिते या दोघांनीही उमेदवारीवर दावा ठोकल्याने महाजन गटातच मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
बोरा-गिते वाद चव्हाट्यावर
आज शालिमार येथील भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. निशेश बोरा गटाचे म्हणणे आहे की शहरातील व्यापारी वर्ग आणि युवकांमध्ये बोरांची मजबूत पकड आहे. तसेच गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महाजन गटासाठी निर्णायक भूमिका बजावली होती.
तर गणेश गिते गटाचा दावा आहे की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये गितेंचा दांडगा संपर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांनाच उमेदवारी मिळायला हवी.
गिरीशभाऊंचे आम्ही कट्टर समर्थक आहोत. पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा बोरा समर्थकांनी दिला. त्यावर गिते गटाने “पक्षाचा निर्णय अंतिम असेल. दबावतंत्राला बळी पडणार नाही असे प्रत्युत्तर दिले.
शिवसेनाही मैदानात, लढत चुरशीची
भाजपमधील या अंतर्गत वादाचा फायदा उठवण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार सुहास कांदे यांचे नाव आघाडीवर आहे. शिवाय शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरलाही उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू आहे.
भाजपमध्ये बोरा-गिते यांच्यातील वाद आणि शिवसेनेची आक्रमक तयारी यामुळे नाशिक विधान परिषदेची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
महाजन गटाची कोंडी
गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा मानले जातात. मात्र त्यांच्याच दोन कट्टर समर्थकांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
या वादावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. इच्छुकांनी अर्ज करावेत. पक्षपातळीवर सर्वेक्षण करून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल,असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 22 मे 2026 रोजी जाहीर झाली आहे. नाशिक, इगतपुरी-त्र्यंबक, दिंडोरी-पेठ, सिन्नर अशा 9 गटांसाठी मतदान होणार आहे. भाजप अंतर्गत बंडखोरी टाळून एकदिलाने लढते की शिवसेना संधी साधते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






















