गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त होते . याच विचारातून बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज मौजे जरूड येथे भेट देत एकाच दिवशी शिक्षण आणि शेती या ग्रामीण जीवनाच्या दोन महत्त्वाच्या घटकांशी थेट संवाद साधला .
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळेला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह , नवीन पुस्तके , नवीन गणवेश आणि नव्या स्वप्नांची चाहूल यामध्ये सहभागी होत तहसीलदार शेळके यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण , शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले . ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील सक्षम नागरिक असून शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडू शकते , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत , जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ती पूर्ण करावीत , असे आवाहनही त्यांनी केले .
त्यानंतर त्यांनी जरूड परिसरातील शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला . यंदाच्या मान्सूनची स्थिती , पावसाचे अनियमित आगमन आणि खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . काही ठिकाणी जमिनीची मशागत , वखरणी , पाळे देण्याची कामे सुरू असल्याची पाहणी करण्यात आली .
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घाईघाईने पेरणी करू नये , असा सल्ला दिला . प्रारंभीच्या हलक्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केल्यास पुढे पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते . त्यामुळे पुरेसा आणि समाधानकारक पाऊस होईपर्यंत किमान चार ते आठ दिवस संयम ठेवावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा , असे त्यांनी सांगितले .

शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्यक्ष औत हाती घेत शेतातील पाळीचे काही मोड घातले . प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात उतरून त्यांच्या कामात सहभागी झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले . शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही वेळोवेळी शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन वैज्ञानिक शेतीचा अवलंब करावा , असे आवाहन केले असून अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी खरीप हंगामात महसूल व कृषी यंत्रणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे . उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीदेखील पेरणीपूर्व नियोजन , जलसंधारण आणि जोखीम व्यवस्थापनावर भर देण्याचे मार्गदर्शन केले आहे . या पार्श्वभूमीवर तहसीलदार शेळके यांची जरूड येथील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे .
यावेळी जरूडचे सरपंच श्रीराम काकडे , उपसरपंच पंजाब काकडे , ज्येष्ठ शेतकरी भगवान काकडे , कल्याण काकडे , लक्ष्मण काकडे , रामनाथ काकडे , महादेव काकडे , आप्पाराव काकडे , विनोद कोरडे तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते . उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीविषयक विविध प्रश्न मांडले असून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली .
ग्रामीण भागातील शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रांशी प्रशासनाने जपलेली ही जवळीक लोकाभिमुख प्रशासनाचे उदाहरण ठरत आहे . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि शेतात शेतकऱ्यांशी साधलेला जिव्हाळ्याचा संवाद या दोन्ही गोष्टींमधून प्रशासनाचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला . गाव , शाळा आणि शेत यांना जोडणारी ही भेट जरूड परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली .






















