सिन्नर ( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व भुईमूग पिकावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. भरत मालुंजकर, वरिष्ठ संशोधन सहायक, गहू संशोधन केंद्र, निफाड यांनी सोयाबीन व भुईमूग पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पीक लागवडीत आवश्यक बदल, बीबीएफ पद्धतीचा अवलंब, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, आंतरमशागत तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ‘पंचसूत्री’ची माहिती देण्यात आली. सुधारित वाणांचा वापर, हेक्टरी योग्य झाडसंख्या राखणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण तसेच योग्य वेळी काढणी व मळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी प्रास्ताविकात अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या हवामान परिस्थितीत शास्त्रीय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी, बीटीएम गोकुळ जाधव, उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत सुधारित तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. एल निनोच्या संभाव्य प्रभावाचा विचार करून हवामानानुकूल तंत्रज्ञान व एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळू शकते, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.






















