गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल राखण्याचा अखंड प्रयत्न म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी शोधलेली ही जीवनपद्धती आज संपूर्ण जगासाठी आरोग्य, शांतता आणि आत्मिक समाधानाचा दीपस्तंभ ठरली आहे. वेगवान तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या युगात माणूस भौतिकदृष्ट्या समृद्ध झाला असला, तरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत चालल्याचे चित्र दिसते. ताण, चिंता, नैराश्य, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांनी मानवी जीवनाला वेढले आहे. अशा परिस्थितीत योग म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली संजीवनीच ठरते. महर्षी पतंजली यांनी “योगश्चित्तवृत्ती निरोधः” या सूत्राद्वारे योगाचे सार सांगितले. मनातील अस्थिर विचारांना शांत करून आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या माध्यमातून मनुष्य स्वतःचा शोध घेतो. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे.
श्वासात भरतो नवा प्रकाश,
मनामध्ये उमलतो विश्वास।
योगाच्या या पवित्र वाटेवर,
सापडतो जीवनाचा सुवास॥
भारतीय संस्कृतीत योगाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि विविध योगग्रंथांमध्ये योगाचे महत्त्व वर्णन केलेले आढळते. हिमालयातील गुहांपासून ते आधुनिक शहरांतील योगकेंद्रांपर्यंत योगाचा प्रवास अद्भुत आहे. एकेकाळी भारतीय आश्रमांमध्ये मर्यादित असलेली ही विद्या आज जगातील १९० हून अधिक देशांमध्ये पोहोचली आहे. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आणि भारताच्या या अमूल्य परंपरेला जागतिक मान्यता मिळाली. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने प्रकाश, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून हा दिवस निवडण्यात आला. आज न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपासून ते पॅरिस, टोकियो, मॉस्को, सिडनी आणि लंडनपर्यंत लाखो लोक सामूहिक योगाभ्यास करताना दिसतात. जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा आहे, संघर्ष नव्हे तर समन्वय हवा आहे, आणि हा समन्वय घडवून आणण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. म्हणूनच योग हा भारताचा सांस्कृतिक वारसा असून मानवतेसाठी सार्वत्रिक जीवनतत्त्वज्ञान बनला आहे.

योग म्हणजे सूर्योदयाची पहिली किरणे,
योग म्हणजे अंतर्मनातील प्रार्थनेची तराणे।
योग म्हणजे शरीर-मनाचा सुंदर मेळ,
योग म्हणजे आयुष्याचा सुवर्ण खेळ॥
आजच्या विद्यार्थ्यांसाठी योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाईन शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि सततच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य प्रभावित होत आहे. अशा वेळी योग आणि प्राणायाम एकाग्रता वाढवतात, स्मरणशक्ती मजबूत करतात आणि आत्मविश्वास दृढ करतात. ग्रामीण भागातील शेतकरी असो किंवा महानगरातील अधिकारी, गृहिणी असो किंवा उद्योजक, प्रत्येकासाठी योग उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सकाळच्या वेळी मंदिर परिसरात, शाळांच्या मैदानात आणि सार्वजनिक ठिकाणी योगसत्रे आयोजित केली जातात. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातही योगाविषयी जागरूकता वाढताना दिसत आहे. बदलते हवामान, अनिश्चित पाऊस, शेतीतील आव्हाने आणि आर्थिक ताण यामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या तणावाखाली असतो. योग त्याला मानसिक स्थैर्य देतो. महिलांसाठी योग म्हणजे आरोग्याचा आधार आहे. हार्मोनल बदल, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरीतील ताण यामध्ये संतुलन राखण्यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावतो. वृद्ध व्यक्तींना सांधेदुखी, रक्तदाब आणि श्वसनविकारांपासून काही प्रमाणात आराम मिळवून देण्याचे सामर्थ्यही योगामध्ये आहे.
“ज़िंदगी एक सफ़र है सुहाना…” या गीतातील आशावाद आणि योगातील सकारात्मकता यांचा भावार्थ एकच आहे. जीवनाचा प्रवास सुंदर बनवायचा असेल तर शरीर आणि मन निरोगी असणे आवश्यक आहे. योग हेच ते साधन आहे जे आपल्याला आतून मजबूत बनवते. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जग घरात बंदिस्त झाले असताना योग आणि प्राणायामाने लाखो लोकांना मानसिक आणि शारीरिक आधार दिला. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारणे आणि मानसिक संतुलन राखणे यासाठी योग प्रभावी ठरला. याच काळात जगाने भारतीय योगपरंपरेची नव्याने दखल घेतली. योग आणि पर्यावरण यांचे नातेही अतूट आहे. योग आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण देतो. वृक्ष, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतांशी सुसंवाद साधण्याचा मार्ग योग दाखवतो. निरोगी पर्यावरण आणि निरोगी मानव यांचा परस्परसंबंध योग स्पष्ट करतो. आज वाढती तापमानवाढ, प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन ही जागतिक चिंतेची कारणे बनली आहेत. अशा वेळी योग आपल्याला संयम, संतुलन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देतो.
वृक्षांची सावली, श्वासांचा ताल,
योग शिकवतो निसर्गाशी जुळवून घ्यायला काळ।
मनात शांतता, हृदयात प्रेम,
योगातून उमलते जीवनाचे नेम॥
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी २१ जून रोजी जगभरात जागतिक संगीत दिन देखील साजरा केला जातो. योग आणि संगीत या दोन्ही मानवी आत्म्याला स्पर्श करणाऱ्या कला आहेत. योग शरीराला स्थिरता देतो, तर संगीत मनाला मधुरता देते. संत तुकारामांच्या अभंगांपासून ते भीमसेन जोशींच्या सुरांपर्यंत, लता मंगेशकरांच्या स्वरांपासून ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांपर्यंत संगीताने मानवाच्या भावविश्वाला समृद्ध केले आहे. संगीत आणि योग यांचा संगम म्हणजे अंतर्मनातील शांततेचा उत्सव आहे. ध्यानधारणेदरम्यान मंद स्वरातील संगीत मनाला अधिक एकाग्र करते. म्हणूनच अनेक योगकेंद्रांमध्ये संगीताचा वापर केला जातो. “सुर निरागस हो…” किंवा “ऐ मालिक तेरे बंदे हम…” यांसारखी गीते मनात सकारात्मकता निर्माण करतात. योग आणि संगीत या दोन्हींचा उद्देश एकच — मानवाला स्वतःशी जोडणे. शरीराला स्वास्थ्य, मनाला शांतता आणि आत्म्याला समाधान देणाऱ्या या दोन महान परंपरा मानवजातीसाठी अमूल्य ठेवा आहेत.
आज जगाला सर्वाधिक गरज आहे ती आरोग्यदायी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीची. योग हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून प्रत्येक दिवस जगण्याची कला आहे. तो भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान आहे, तर संगीत हे मानवतेच्या भावविश्वाचे वैश्विक स्वरूप आहे. योगाच्या साधनेतून शरीर सुदृढ होते, मन प्रसन्न होते आणि आत्मा समाधानी होतो. संगीताच्या सुरांतून जीवनाला लय मिळते, भावनांना दिशा मिळते आणि आनंदाची अनुभूती होते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन हे दोन्ही दिवस मानवाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देतात. चला, या निमित्ताने योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया, संगीताला मनाचा साथीदार बनवूया आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवनाचा संकल्प करूया.
चंद्रकांत प्रकाश शेळके
तहसीलदार, बीड






















