दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दौंड नगरपरिषदेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आवश्यक तेवढा साठा राखीव ठेवणे, सार्वजनिक विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती करणे, गरज भासल्यास पाणीटँकर सज्ज ठेवणे, बेकायदेशीर नळजोडण्या व पाणीउपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे तसेच पाणीगळती तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना अखंडित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
सदर निवेदन मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे तसेच उपनगराध्यक्षा सौ. छायाताई थोरात यांना देऊन ही मागणी करण्यात आली. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली आहे.






















