जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या उर्वरित अनुदानाच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सिंचन विहीर मंजूर झाली होती. विहिरीच्या कामासाठी मंजूर असलेले उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी संशयित सागर नावकर याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत संशयिताने अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी २२ जून २०२६ रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.






















