गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या सुविधा सहजपणे मिळाव्यात या उद्देशाने जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात नायब तहसीलदार सुहास हजारे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर आणि नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रतेचे निकष तसेच लाभ मिळविण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सहाय्य योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. शासनाच्या विविध निर्णयांनुसार एकल महिलांना आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी लाभ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती उपस्थितांना समजावून सांगण्यात आली.
महिलांना ऑनलाइन सेवा, महाऑनलाइन केंद्रांमार्फत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार संलग्नीकरण, बँक खाते, तसेच विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आम्रपाली साबळे, अयशा रेहाना पठाण तसेच संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता, स्वावलंबन आणि न्याय्य हक्कांसाठी शासन कटिबद्ध असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
शासनाच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भविष्यातही ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि सहाय्य उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.























